नागपुरातील आठवणीतला बालपणीचा "उन्हाळा"
गेले ... ते ...दीन.... गेले
अर्चना चन्ने
शाळेत असतांना शालेय वार्षिक परीक्षा संपता संपतांच
उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असे.वार्षिक परीक्षेचा
शेवटचा पेपर झाल्याझाल्या आम्ही सुटकेचा निःश्वास
सोडून, आता उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचे
याचे बेत आखत असू.
यात पहिला आणि सर्वांच्या आवडीचा बेत म्हणजे सिनेमाला जाणे! मग आम्ही भावंडं आणि शेजारील
मित्र मंडळी यांच्यात चर्चा होऊन ,सिनेमा बघायचा बेत तडीस जात असे. घरापासून बस स्थानापर्यंत पायी आणि नंतर बस स्थानापासून सिनेमा गृह पर्यंत पायपीट करावी लागत असे. सिनेमा बघितल्या नंतर भेळ,ऊसाचा रस
पिल्याशिवाय सिनेमा पाहिल्याचे पूर्ण समाधान मिळत नसे.पुन्हा तशीच पायपीट करून तृप्त मनाने घरी परतत
असू.
सुट्टया सुरू होताच मी वाचनालयातून लहान मुलांची
पुस्तके आणून वाचीत असे.त्या काळात रामायण,महाभारत, सिंदाबादच्या सफरी,विक्रम वेताळ,इसापनीती,चांदोबा, कुमार मासिक ,जादूची चटई,वगैरे खूप पुस्तके वाचली.थोडे मोठे झाल्यावर वडिलांनी त्यांच्या ऑफिस च्या वाचनालयातून आणून दिलेली छावा, श्रीमान योगी,स्वामी, राऊ,शामची आई ही प्रसिद्ध पुस्तके
पण वाचण्यात आलीत.
या वाचन संस्कृतीतूनच पुढे वाचनाचा छंद जडला जो की आजतागायत चालू आहे.
सुट्ट्यांमध्ये आता आम्ही सगळे "मोर्निंग वॉक" ला
तेलंगखेडी बगीचाकडे जात असू.वाटेत झाडांवरील
गाभूलल्या चिंचा आम्ही दगड मारून पाडून ,मस्त खात खात बगीच्यात फेरफटका मारायचो.
दुपारच्या वेळी बाहेर खूप गरम असल्यामुळे आम्ही
मैत्रिणी घरातल्या घरात पत्ते, बिट्टया, सापशिडी, कॅरम,गाण्याच्या भेंड्या, लूडो,लपाछपी, नाव -गाव - वस्तू _प्राणी
हे खेळ खूपदा खेळायचो. rxखेळतांनाच कधी सिनेमाची गाणी पण म्हटल्या जायची
!फार धम्माल यायची तेव्हा!
पत्यामध्ये पाच_तीन दोन ,सात _आठ,गुलाम चोर,
गड्डेझबू, सत्ता लावणी हे नेहमीच खेळले जायचे. खेळायला
खूप जण असतील तर आणखी एक खेळ खेळायचो,
नाटे आठे ठोम! हा कोणता खेळ प्रश्न पडला न?
याच खरे नाव आहे Not At Home. पुढे काही वर्षांनी याचे खरे नाव कळले व आमचा गाढवपणा पण आमच्या लक्षात आला! हे सर्व खेळ खेळताना खूप खूप मज्जा यायची,लुटुपुटूची भांडणेही व्हायची .पण लगेच सर्व विसरून पुन्हा खेळणे सुरूच रहायचे.
रोज एकेकीकडे आम्ही खेळत होतो.जिच्याकडे खेळायचो तिची आई दुपारी आम्हाला कच्चा चिवडा,उकडलेली बोरे,कैरीची डाळ,पन्हे असे काहीतरी नाश्त्याला बनवत असे.त्या सर्व पदार्थांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.आम्ही मैत्रिणी बाहुलाबाहूलीचे
लग्न देखील खूप थाटामाटात करत होतो.अंगणात छान काड्यांचा मंडप टाकून त्याला छान रंगीबेरंगी कपड्यांनी सुशोभित करून त्यात बाहुला बाहुलीचे लग्न लावले जाई.
मग तीन चाकी सायकलवर वाजत गाजत छान वरात काढून मस्त मिरवून घेत होतो.त्यानंतर प्रत्येकी कडुन आणलेल्या पदार्थांची अंगत पंगत होऊन हा सोहळा संपन्न होतअसे. खरेच!छोट्या छोट्या गोष्टींतून मनमुराद आनंद
वेचायचे ते दिवस होते.
सायंकाळी घरासमोरच्या रस्त्यावर वीटेच्या तुकड्यांनी
आखून टिक्कर बिल्ला तसेच लगोरी,लंगडी हे खेळ खेळले जायचे.कधी रेशटीप तर कधी दोरीवरच्या उडी
हे खेळ पण खूप धमाल आणायचे.त्याकाळी अगदी थकेपर्यंत आम्ही सगळे खेळत असू.
सायंकाळी अंगणातल्या झाडांना पाणी टाकणे,अंगणात पाणी टाकणे ही कामे आईने आम्हा भावंडांना वाटून दिलेली होती.रात्री अंगणातच पलंग टाकून झोपण्याची व्यवस्था केली जात असे. रात्रीपण झोपेपर्यंत आम्हा मित्रमंडळीच्या गप्पा संपत नसत.रात्री गार झालेल्या बिछान्यावर पडून आकाशातील ग्रह , तारे न्याहाळनाचा
आनंद केवळ अवर्णनीय असाच होता.रात्री एक कुल्फीवाला तसेच त्यावेळी ब्ल्यू बेल आइसक्रीम
रस्त्यावर विकायला येत असे. आईचा मूड असेल तर
आम्हाला त्याचा आस्वाद घ्यायला मिळत असे.त्याकाळी
या पदार्थानं मधून विषबाधा होइल असे विचार देखील कोणाच्या मनात येत नसत.बिनधास्त पणे आम्ही
घरच्या, बाहेरच्या सर्व पदार्थांचा समाचार घेत होतो.
माझ्या घराच्या परिसरात खूप आंब्याची झाडे होती.
कधी खूप वादळ आले किंवा जोराचा वारा आला की आम्ही त्या झाडाखाली कैऱ्या खाली पडण्याची आतुरतेने वाट बघत बसायचो. जमिनीवर टप टप पडलेल्या कैऱ्या वेचून
आणून ,त्या धुवून ,त्यांच्या बारीक बारीक फोडी करून
त्यात तिखट ,मीठ व तेल घालून त्या करकरीत फोडी खाण्याचा आनंद! वाह! आताही हे लिहित असताना
माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे!
इकडे आम्हा मुलांचे हुंदडणे सुरू असतांनाच आईचे
उन्हाळ्यातील वाळवण करण्याचे काम सुरू झालेले
असायचे.मुंगवडी, कुरड्या, बटाटा चिप्स, ज्वारीचे पापड,
मुगाचे लाटून केलेले पापड ,असे खूप प्रकार ती करायची.मी या कामात तिला पुष्कळ मदत करीत असे.
ओले ज्वारीचे पापड(धापोडे)खाण्याची मज्जा काही वेगळीच होती.अर्धे अधिक पापड आम्ही ओले असतांनाच फस्त करीत होतो.
त्याकाळी उन्हाळ्यात आंब्याचा रस हा बहुतेक गावरानी आंब्याचाच केला जात होता.त्या आंब्याचा रस करणे हे तसे वेळकाढूच काम असायचे,पण त्याचा रस मात्र फार चविष्ट लागत असे. रस न करताही ,असेही ते आंबे माचवून
खाण्यात एक वेगळीच मज्जा येत असे.आजमात्र हा गावरानी आंबा दुर्मिळ झाला आहे.सध्या बाजारात विविध प्रदेशातील,विविध प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत पण मनात खोलवर कुठेतरी गावरानी आंब्याचा गोडवा
रुतून बसला आहे.
त्याकाळी घरोघरी पंखेच असत.नंतर पाण्याची मोटर
नसलेले साधे कुलर आले.त्यात वरून पाणी घालावे लागत असे.,त्यामुळे मग खिडक्यांना खसचे पडदे लावून त्यावर सतत पाणी टाकून घरात,कार्यालयात, दुकानात सर्वीकडे थंडावा निर्माण केला जायचा.
त्याकाळी उन्हाळ्याच्या सुट्टया मध्ये काका,मामा आत्या
कडे राहायला जायची पद्धत होती.ती पण भावंडं आमच्याकडे राहायला यायची.मग काय! खाण्या पिण्याची,सिनेमा बघण्याची चांगली चंगळच चंगळ सुरू व्हायची.
अशाप्रकारे अतिशय आनंदात सुट्ट्या उपभोगत
असतांनाच, परीक्षेचा निकाल लागून सर्वजण पास
झाल्याचा आनंद सर्व घराला सुखावून जायचा.
वर्गातील नंबर, मार्कांची टक्केवारी या कशाचाही या निकालात संबंध नसायचा.
जून १५ नंतर आता पावसाची चाहूल लागायची आणि आम्हालाही आता शाळा सुरु होऊन पुढील वर्गात जायचे
वेध लागायचे.पुढील वर्गाची पुस्तके, गणवेश, दफ्तर
वगैरे शालेय साहित्याची जमवाजमव करत आता शाळा सुरू होण्याची आतुरतेने प्रतिक्षाच तेव्हढी सुरू असायची.