महालातला आलुबोंडा आणि ईतर आठवणी

महालातला आलुबोंडा आणि ईतर आठवणी

माझा जन्म पुसदचा. १९४९चा. पण मला नागपूर आठवते ते १९५४पासून. तेव्हा माझे मामा सुधाकर धामणगावकर डीएजीपीटी मध्ये 'लागले' होते आजी आणि मामीसह गिरीपेठ मध्ये किरायाने नायडूंच्या घरात रहात असत. त्यांच्यासोबत लाडका भाचा म्हणून मीही रहात असे.आमचे बहुतांश नातेवाईक मात्र महाल-ईतवारीत रहात असत.

१९५४ला भर उन्हाळ्यात एका नातेवाईकाचे लग्न जेवून आम्ही रणरणत्या दुपारी बसने टिळक पुतळा स्टॉपवर मी अनवाणी पायाने (तेव्हा मॅट्रिक होईपर्यंत मुलांना पादत्राणे देण्याची पद्धत नव्हती) उतरलो होतो आणि पाय पोळले म्हणून थय थय नाचत सुटलो होतो ही आठवण अजूनही माझ्या मनात घर करुन आहे नंतर आजीने मला उचलून घेतले रात्री त्या पोळलेल्या पायांना घोळीच्या भाजीमध्ये ठेवले होते तेही चांगले आठवते.

त्यानंतर माझ्या मामांनी नोकरी बदलली ते मूळ गाव वर्धेला राहायला गेले. तेथे सुध्दा मी त्यांच्याबरोबर राहत असे. 1962 पर्यंत मी मामाच्या घरी वाढलो. वर्धेला राहत असताना सुद्धा लग्नकार्य आणि इतर समारंभासाठी महिना दोन महिन्यातून नागपूरला येणे जाणे होत असे त्यामुळे नागपूर हे अनोळखी शहर वाटत नसे. त्या काळात नागपूरमध्ये सिटी बस हे मध्यमवर्गीयांचे फिरण्याचे आवडते माध्यम होते. गिरीपेठला राहत असताना अनेकदा व्हेरायटी चौकात बसची वाट पाहून शेवटी व्हेरायटी चौक ते गिरी पेठ, मामाचा हात धरून पायी प्रवास केल्याचे आठवते. गिरीपेठला सिटी बस पकडायची असेल तर धरमपेठला जावे लागे. हे अंतर पायी गेल्याचे अनेक प्रसंग आठवतात. पण त्यावेळेला नागपूर इतके गजबजलेले नव्हते रस्त्यावर सायकल, सायकल रिक्षा, क्वचित कापडी टपाच्या फोर्ड मोटारी सिटी बस एवढीच वाहने दिसत असत. आमच्या एका नातेवाईकाकडे कापडी टपाची फोर्ड मोटर होती. ते इतवारीत सुदाम बुवाच्या मठाजवळ राहायचे. आडनाव बहुतेक आसरकर होते असे आता अंधुकसे आठवते. एकदा त्यांनी आम्हाला इतवारीतून गिरीपेठ पर्यंत स्वतःच्या मोटरने सोडून दिले होते. ही एक आठवण जमेस आहे. कदाचित तो माझा पहिलाच मोटर प्रवास असावा कारण कारमध्ये बसण्याचे प्रसंग त्याकाळी क्वचितच यायचे.

1956 च्या सुमारास माझ्या मामांनी नागपूर सोडले वर्धेला ते क्रैडॉक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. वर्धेला त्यांचे वडिलोपार्जित घर होते त्यामुळे आम्ही वर्धेला राहायला गेलो. हे माझे आजोळ. 1956- 58मी पुसदला शिकलो 1958 साली मी पुसदहून चौथी पास केले, शहरात माझा पहिला नंबर आला होता. त्यामुळे मला पुसद नगरपालिकेची बारा रुपये महिन्याची स्कॉलरशिप सुद्धा आठवीपर्यंत मिळत होती. पुसद नगरपालिका आमच्या क्रैडॉक हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना ( बी बी सिंगम) दरमहा मनी ऑर्डर पाठवत असे नंतर ती मला मिळत असे. 1962 पर्यंत ही स्कॉलरशिप मी घेतली आठवी पास झाल्यानंतर मी पुसदला राहायला गेलो. तिथे मग 1965 ला 11वी मॅट्रिक 1968 ला ग्रॅज्युएट झाल्यावर तंयार कपड्यांचे दुकानदारी करु लागलो. खरे तर मी 1962 पासूनच वडिलांबरोबर ( नारायण देवराव पांढरीपांडे उपाख्य नैडेपकाका) दुकानात जात असे पण 68 साली नैडेपकाका आजारी पडले त्यांनी दुकान सांभाळायला कायमचा रामराम ठोकला ते नंतर सामाजिक कामांमध्ये रस घेऊ लागले. त्यामुळे 1968 नंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. असो मुळात लिहायचे आहे ते नागपूर बद्दल पण हे विषयाला थोडे फाटे फुटले आहे ते आपण समजून घ्यावे.

1962 ते 1968 मी पुसदला राहत असताना नागपूरला अनेकदा यावे लागत असे. कारण माझे काका वामन देवराव पांढरीपांडे हे नागपूरच्या कमिशनर ऑफिसमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करीत असत ते वॉकर रोडवर दिवाणांच्या वाड्यात किरायाने राहत असत. त्यामुळे नागपूरला आलो की माझा मुक्काम दिवाणवाड्यातच असे. दिवाणवाड्याच्या अगदी मागे संघ बिल्डिंग आहे हे बहुतेकांना माहित आहेच. नागपूरच्या मुक्कामात आम्ही चुलतभाऊ पौगंडावस्थेतले तरुण होतो. माझा भाऊ विश्राम उर्फ राम आणि त्याचा मोठा विनायक उर्फ विनू यांच्याशी माझी चांगली गट्टी असे. आमच्या तिघांचाही आवडता छंद म्हणजे महालात अनेक हॉटेलमध्ये मिळणारा रस्सेदार आलूबोंडा खाणे. त्यासाठी आम्ही भाजीच्या पैशातून किंवा दुसऱ्या काही वाण सामानाच्या पैशातून किमती वाढवून पैसे वाचवत असू पुरेसे पैसे जमले की एखाद्या हॉटेलात जाऊन आलूबोंड्यावर ताव मारत असू.त्यावेळी हॉटेल्स, नरसिंग टॉकिज, नवी शुक्रवारी, टिळक पुतळा भागात असत. हे आम्हीच करत होतो अशातला भाग नाही. त्यावेळेला आमच्या वयाची असंख्य पौगंडावस्थेतली मुले हा मार्ग अवलंबत असत. माझा एक मैराळ नावाचा मित्र तर आलुबोंडयाचा इतका मोठा भक्त होता की तो सुका आलू बोंडा हाफ पॅन्टच्या खिशामध्ये ठेवून रस्त्याने चालता चालता कुरतडून तोंडात टाकत असे अशा तऱ्हेने आलू बोंडा संपवत असे. आज हे सगळे आठवून हसू येते पण या चोऱ्यामाऱ्या वगैरे आम्ही आलुबोंडयासाठी लहानपणी करत होतो हे सांगायला लाज मात्र वाटत नाही. कदाचित माझ्या वयाच्या बहुतेकांनी हा मार्ग पौगंडावस्थेत अवलंबला असावा असा माझा समज आहे.

त्यावेळी नागपुरात बर्डीवर विश्रांती गृह मध्ये चांगला दोसा, इडली सांभारवडा मिळत असे. पण त्याच्या किमती आमच्या आवाक्या बाहेर असल्याने आणि वाकर रोडवरुन बर्डी लांब पडत असल्याने आम्ही त्याचा आस्वाद सठीसहामाशी कधीतरी घेत असू. आणि तो दिवस आम्हाला सणासारखा वाटे. त्यासाठी सकाळपासून भरपूर तयारी करावी लागे. कारण बस पकडून मोर भवनला येऊन विश्रांती गृह मध्ये जावे लागे.

नागपूरच्या बालपणातल्या या अशा आठवणी अनंत आहेत.

माझ काकांना हातमशीनवर कपडे शिवण्याचा छंद होता.एकदा ते संध्याकाळी ऑफिसमधून येतानाच चौकडयाचे डिझाइन असलेले एक कापड घेऊन आले. चहा घेतल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली रात्री .३०च्या सुमारास माझ्या साठी रामसाठी दोन टी शर्ट शिवून आम्हाला दिले. तेव्हा जॉय मुकर्जी हा हिरो फॉर्मात होता त्यानेच एक बटनच्या टी शर्ट ची फैशन रुढ केली होती, ते काकांना बहुधा माहित होते.

त्याकाळी आम्ही नागपुरात भरपूर पायी फिरत असू. म्हणजे वाकर रोड ते रेशीम बाग ग्राऊंड हे अंतर आमचे म्हणजे आवडता फिरण्याचा मार्ग होता. वाकर रोड ते एम्प्रेस मिल समोरून रेल्वे स्टेशन किंवा संत्रा मार्केट हा सुद्धा आमचा फिरण्याचा मार्ग असे. कधी शुक्रवार तलावाच्या मधल्या बेटातही आम्ही जात जाऊन बसत असू. हा लेख लांब झाला आहे त्यामुळे इथेच थांबतो. परंतु मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, हे आश्वासन देऊनच.

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *